खर्च करताना राज्यांनी केंद्राची शिस्त पाळणे जरूर
नवी दिल्ली, दि. 20 – आज केंद्रीय अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी अंदाजपत्रकावरील तीन दिवसांच्या चर्चेस राज्यसभेत उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले, राज्यांच्या स्वायत्ततेवर आघात करण्याची केंद्राची इच्छा नाही, परंतु राज्यांनी खर्च करताना कोणती शिस्त पाळली पाहिजे हे सांगण्याचा केंद्राचा हक्क आहे व केंद्र तो बजावणार. कारण चलनवाढ रोखण्यासाठी केंद्राचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी हे आवश्यक आहे. आज राज्यसभेत पंतप्रधान इंदिरा गांधींनी असे सांगितले की, मंत्र्यांची येणी व देणी किती आहेत ती जाहीर करण्याचा सरकार विचार करीत आहे. इतके दिवस मंत्री आपल्या मालमत्तेचा हिशोब फक्त पंतप्रधानांना सादर
करीत असत.
अमेरिकेकडून भारताला आठ लाख टन गहू
वॉशिंग्टन – “शांततेसाठी अन्न’ या अमेरिकन योजनेच्या नव्या करारानुसार अमेरिका भारताला आठ लाख टन गहू पुरविणार असल्याचे आज कृषिखात्यातर्फे सांगण्यात आले. गेल्या सुमारे 4 वर्षांतील, भारताशी झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे. आज त्यावर सह्या झाल्या.मुळा नदीवर धरण होणार
संगमनेर – अकोले तालुक्यात मुळा नदीवर खडकी आणि आंबीत येथे धरणे बांधून संगमनेर, अकोले भागातील पठार भागाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी सुगंधराव देशमुख यांनी केली. राहुरी तालुक्यात मुळा धरण झाले असले तरी मुळेचे 20 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या पाण्याचा उपयोग पठार भागात कायापालट होण्यासाठी करावा.