हिमांशू
वीस-पंचवीस वर्षांनी आपण कोणत्या जगात असणार आहोत? प्रश्न अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटवणारा आहे, खरंय! आपल्याला तूर्त तरी आज आणि त्यातल्या त्यात “आत्ता’ एवढंच महत्त्वाचं आहे. काल काय घडलं याच्याशी आपल्याला देणंघेणं राहिलेलं नाही आणि उद्या जे काही चांगलं-वाईट घडणार असेल, ते जाणून घेण्याची गरज उरलेली नाही. ही मानसिकता बनलीय की बनवली गेलीय, हेही आपल्याला समजून घ्यायचं नाहीये.
काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, 2050 पर्यंत समुद्राची पाणीपातळी खूपच वाढेल आणि मुंबईसारखी समुद्रकिनाऱ्यावरची काही शहरं बुडायला सुरुवात होईल. शब्दशः असंच घडेल असं नाही आणि ते 2050 मध्येच घडेल असंही नाही. परंतु कधीतरी घडेल तेव्हा काय करायचं? हा प्रश्न अशा शहरात राहणाऱ्या एका तरी व्यक्तीच्या मनात आहे का? अशा शहरांमध्ये ज्यांनी कोट्यवधी रुपये खर्चून फ्लॅट घेतलेत त्यांना तरी काळजी वाटतेय का?
अजिबात नाही! जणूकाही आपण सारे अमरपट्टा घेऊन जन्माला आलो आहोत आणि “प्रियंका चोप्राने तिच्या नावातलं सासरचं आडनाव का वगळलं,’ हाच जणू आजमितीस मानवजातीपुढचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. कोविडसुद्धा आता कायमचा निघून गेलाय, असं समजून आपण पूर्वीसारखं जगू लागलो आहोत. एवढं नुकसान करूनसुद्धा आपण कुणाच्या लक्षात राहात नाही, हे पाहून कोविड जिंकूनसुद्धा हरलाय!
आपली ही बेफिकिरी उद्याच्या आभासी दुनियेत जगण्याची रंगीत तालीम तर नाही ना? “प्रियंका चोप्राने नाव का बदललं,’ या प्रश्नाप्रमाणेच “फेसबुकने नाव का बदललं,’ या प्रश्नाची चर्चा आपण याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी केली होती. एक संपूर्ण आभासी विश्वात आपल्याला घेऊन जाण्याची तयारी सुरू झालीय. आज फेसबुकने सुरू केली; उद्या आणखी काही कंपन्या करतील.
“मेटावर्स’ नावाच्या त्या तांत्रिक दुनियेचा आणखी काही तपशील उपलब्ध झालाय. ऑग्युमेन्टेड रिऍलिटी, व्हर्च्युअल रिऍलिटी, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा यंत्राला मानवी चेहरा देणाऱ्या आणि माणसाचं यंत्र बनवणाऱ्या सगळ्या तंत्रज्ञानांचं एकत्रीकरण करून ही दुनिया आपल्यापुढे उभी ठाकणार आहे. आपणसुद्धा “खरे’ राहणार नाही. विशिष्ट हेडसेट लावला, की आपला “डिजिटल अवतार’ तयार होईल आणि तो या दुनियेत शिरेल.
कुठेही जावंसं वाटलं तरी आपल्या मनातला विचार ओळखून हे तंत्रज्ञान आपल्याला तिथे घेऊन जाईल. मग इजिप्तचे पिरॅमिड पाहायचे असोत वा आयफेल टॉवर! आपल्या मित्राला (जो आपल्यासारख्याच डिजिटल “अवतारा’त असेल) समोरासमोर भेटल्याचं सुख आपल्याला घेता येईल. व्हॉट्सऍपचा ग्रुप तयार करावा तसा आपण आपल्यासारख्या माणसांचा “कळप’ या आभासी जगात करू शकणार आहोत.
“खरं जग आणि आभासी जग यातलं अंतर कमी करणारी जादू’ असं या तंत्रज्ञानाबाबत बोललं जातंय. अर्थात, ऍडव्हान्स्ड कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे अजून हे सगळं प्रत्यक्ष घडायला 25-30 वर्षे लागतील म्हणे! आजच सोशल मीडियात माणसं एवढी आकंठ बुडालीत, तर त्यावेळी काय चित्र असेल? एखाद्या गोष्टीला व्हर्च्युअली स्पर्श करणं, वास घेणंही शक्य होणार आहे म्हणे! फक्त एकच गोष्ट समजू शकली नाही. पोट व्हर्च्युअली कसं भरणार?