– हिमांशू
मुंबई-गोवा महामार्गाची सद्यःस्थिती बिकट आहे, हा भाग वेगळा; पण सामान्यतः गोव्याला जाणं हा “विशिष्ट’ व्यक्ती आनंदाचा परमोच्च बिंदू मानतात. कुटुंबासमवेत गोव्याला जाणं या “विशिष्ट’ व्यक्तींच्या पचनी पडत नाही. मित्रांबरोबर जायला लगेच तयार! अर्थातच, गोव्यातले समुद्रकिनारे आणि जुन्या वास्तूंपेक्षा जास्त आकर्षण असतं ते नशेचं! असं असलं तरी नशेखोरीत “टॉप टेन’ असणाऱ्या राज्यांमध्ये गोव्याचा समावेश नाहीये, बरं का! मद्य आणि अंमली पदार्थांच्या नशेत गुरफटलेल्या व्यक्तींची जी ताजी आकडेवारी समोर आलीये, ती अस्वस्थ करणारी आहे. देशभरात दारू आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत असून, केवळ मद्यपान करणाऱ्यांची संख्या रशियाच्या लोकसंख्येइतकी म्हणजे 16 कोटींवर पोहोचली आहे.
दारू निषिद्ध मानली जाण्याचा काळ कधीच मागे गेलाय आणि आता ती “स्टेटस सिम्बल’बनलीये. काही क्षेत्रं तर अशी आहेत, जिथं “न घेणारा’ बावळट ठरतो. उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमध्ये अशी माणसं एकटी पडतात. पार्ट्या आयोजित करण्यामागची कारणं वाढत चालली आहेत आणि दोन पार्ट्यांमधलं अंतर मात्र कमी-कमी होत चाललंय. अर्थातच, नशेची चटक वाढत जाऊन दारूवरचं अवलंबित्वही दिवसेंदिवस वाढत चाललंय. 16 कोटी मद्यशौकिनांमधील 19 टक्के असे आहेत, जे दारूशिवाय राहूच शकत नाहीत. समाजकल्याण आणि सशक्तीकरण मंत्रालयानं एम्सच्या नॅशनल ड्रग्ज डिपेन्डन्स ट्रीटमेन्ट सेंटरच्या माध्यमातून केलेलं सर्वेक्षण व्यसनाधीनतेचं जळजळीत वास्तव सांगणारं आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नशाग्रस्त लोकांची संख्या कोटींमध्ये आहे. मद्य आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येची ही बेरीज आहे. उत्तर प्रदेशात 3 कोटी 86 लाख लोक दारूचं तर 1 कोटी 74 लाख लोक ड्रग्जची नशा करतात. एकूण नशाखोरांची संख्या 5 कोटी 60 लाख इतकी आहे. या बाबतीत दुसरा क्रमांक दुर्दैवानं महाराष्ट्राचा लागतो. एकूण नशेखोरांची संख्या आपल्या राज्यात 2 कोटी 6 लाख असून, त्यापैकी 50 लाख 43 हजार लोक दारूच्या तर 1 कोटी 56 लाख लोक ड्रग्जच्या नशेत अडकलेत. अंमली पदार्थांच्या विळख्यात गुरफटलेल्यांची संख्या मद्यपींच्या दुप्पट असणं ही धोक्याची घंटा आहे.
उत्तर प्रदेशात नशेखोरी जास्त असली तरी मद्य आणि अंमली पदार्थांच्या बाबतीत बरोबर उलट चित्र आहे. महाराष्ट्राखालोखाल प्रत्येकी सुमारे दीड कोटी नशेबाज असणारी पश्चिम बंगाल, पंजाब आणि मध्य प्रदेशात आहेत. तमिळनाडू, हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश ही “टॉप टेन’ यादीतली अन्य राज्यं आहेत. व्यसनांच्या बाबतीत परिस्थिती हाताबाहेर चाललीय, असा याचा अर्थ! व्यसन करणाऱ्या प्रत्येकाचं काहीतरी कारण असतंच. काहीजण अत्यानंदात तर काही अतिदुःखात व्यसन जवळ करतात. हे कारण त्याच्या आसपासचे लोक उगीचच गोंजारतात आणि त्यामुळंच समस्या वाढत जाते. खरं तर नशेसाठी जी कारणं पुढं केली जातात, तशीच समस्या असलेले असंख्य लोक असतात आणि ते नशेशिवाय जगतातच. म्हणूनच नशेच्या कारणावर नव्हे तर कारण सांगण्याच्या प्रवृत्तीवर पहिला प्रहार करायला हवा. 140 कोटी लोकसंख्येच्या देशात 37 कोटी लोक नशेबाज असणं अत्यंत घातक आहे.