पवनानगर -पवनमावळ परिसरात ऊस बांधणीला(आंतरमशागतीला) सुरुवात झाली आहे. ऊस हे महत्वाचे नगदी पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढू लागला आहे. त्यामुळे ऊस लागवडीला मावळातील शेतकरी आता प्राधान्य देऊ लागल्याचे चित्र आहे.
मावळ तालुक्यात भातशेतीनंतर ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ऊसाच्या शाश्वत आणि अधिक उत्पादनासाठी पुर्व मशागत, लागण, आंतरमशागत तसेच कापणी अशी कामे वेळच्या वेळी होणे व योग्य पध्दतीने होणे अत्यावश्यक आहे. ऊस पिकातील ही कामे करण्यासाठी मोठया प्रमाणात मजुरांची गरज असते. परिणामी यासाठी होणारा खर्चही भरमसाठ होतो.
हा खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी यंत्राचा वापर करु लागला आहे. यंत्राचा वापर केल्यामुळे वेळही कमी लागते व खर्चही वाचतो. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे ते शेतकरी त्याच्या साह्याने उसाची बांधणी(आंतरमशागत ) करतात.तर काही शेतकरी ट्रॅक्टर व पॉवर ट्रेलरच्या साहाय्याने ऊसाची आंतर मशागत करत आहेत.
ऊस लागवडीचा जर विचार केला तर साधारणपणे 30 ते 40 टक्के खर्च निव्वळ मजुरीवरच होतो. एकीकडे वाढत चाललेले मजुरीचे दर आणि दुसरीकडे शेतीच्या कामासाठी मजुरांची कमी उपलब्धता यामुळे शेतीमध्ये सुधारित अवजारांचा व यंत्राचा वापर करणे गरजेचे झाले आहे.