दौंडच्या जिरायत भागातील शेतकरी संभ्रमात
सततच्या दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना हवा दिलासा
नव्या सरकारकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अपेक्षा
वासुंदे (वार्ताहर) – सलग चार वर्षे दुष्काळ असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांचे कर्ज गेले कित्येक महिने, वर्ष थकल्यामुळे आणि जिरायत भागातील शेतकऱ्यांची क्षेत्र मर्यादा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज दोन लाखांपेक्षाही जास्त आहेत, त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफीवर “कही खुशी, कही गम’ अशी अवस्था झाली असून, येथील शेतकरी सरकारच्या या घोषणेनंतर संभ्रमातच असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही वर्षांपासून दौंड तालुक्याच्या जिरायत भागात दुष्काळ आणि आताचा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने येथील शेतकरी खऱ्या अर्थाने पिचलेला आहे. दुष्काळाशी सामना करता करता आता रब्बीसाठीही त्याला धडपड करावी लागत आहे. या भागात शेतीसाठी कर्ज घेऊन गेले कित्येक महिने-वर्ष होऊन गेले. मात्र सततच्या दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना कर्ज भरताच आले नाही, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा कर्जफुगवठा वाढलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा दोन लाखांपेक्षा जास्त असून, मागील सरकारने अटी-शर्ती घालून तत्त्वतः सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती. त्याचा कित्येक शेतकऱ्यांना फायदा झालाच नाही. या कर्जमाफीचा बोजवारा उडाल्याचे कित्येकवेळा चर्चेवेळी पाहिला मिळाले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी फडणवीस सरकारच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत झालेल्या कर्जमाफीवर टीका करण्याची संधी
सोडली नाही. आमचे सरकार आले तर सरसकट कर्जमाफी देऊ असे म्हणणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बदलले की काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांची सरकारने केली बोळवण
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचे जाहीर केले. मात्र, एवढी अत्यल्प मदत शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढणार नाही, शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती करण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना व शेतकरी हिताच्या योजना आखण्याची गरज आहे. महाविकास आघाडीने केलेली दोन लाखांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची एक प्रकारची बोळवण केली असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. सरसकट कर्जमाफीऐवजी दोन लाखांपर्यंत केलेली कर्जमाफी ही एक प्रकारची शेतकऱ्यांची थट्टाच आहे.
ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे दोन लाखापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना मध्यम मुदत,ठिबक सिंचन,गायगोठा, शेती व शेतीपुरक अशा अन्य कर्जांच्या माध्यमातून अन्य सवलती मिळणे गरजेचे आहे व दोन लाखाची मर्यादा ही मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी खूपच कमी असल्याने ती वाढवून मिळावी अन्यथा भविष्यात शेतकरी आत्महत्यांचे लोण पुणे जिल्ह्यातील जिरायत भागात पोहोचल्याशिवाय राहणार नाही.
विलास जांबले, माजी चेअरमन वि. का.सोसायटी वासुंदे, अध्यक्ष शांताई शेतकरी बचत गट