नवी दिल्ली – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आले असताना तेथे उपस्थित असलेल्या आम आदमी पक्षाच्या दोन खासदारांनी थेट हातात फलक फडकावत शेतकरी आंदोलनाविषयी मोदींच्या विरोधात घोषणबाजी केली. अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे सेंट्रल हॉलमधील वातावरण काही काळ तणावग्रस्त बनले होते.
आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान आणि संजयसिंह या दोघांनी थेट पंतप्रधानांनी बॅनर दाखवत ही घोषणाबाजी केली. संजयसिंह यांनी या प्रकाराचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून प्रसारीत केला. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा आणि एमसपीला कायदेशीर मान्यता द्या, अशी मागणी करणारे फलक त्यांनी फडकावले होते. पंतप्रधानांनी या घोषणाबाजीतच अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थितांशी काही मिनिटे बोलून ते सेंट्रल हॉलच्या बाहेर निघून गेले.
त्यानंतर एका वाहिनीशी बोलताना संजयसिंह म्हणाले की, मोदींनी संसदेचे अधिवेशनच घेतले नाही. त्यामुळे आमचे म्हणणे संसदेत मांडण्याची संधीच आम्हाला या सरकारने मिळू दिली नाही. मोदी सरकारच्या या कृषीविषयक कायद्यांच्या विरोधात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
हे काळे कायदे मोदींनी त्वरित मागे घेतले पाहिजेत, अशी मागणीही संजयसिंह यांनी केली.
भगवंत मान यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले असून मोदींनी आपले डोळे आणि कान बंद करून घेतले आहेत. म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.