शिरवळ – वरुड, ता. खटाव येथील तेजल आप्पासाहेब साळुंखे (वय 23) ही हरतळी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात बेपत्ता झाली आहे.महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड व शिरवळ येथील बचाव पथकांच्या सहकार्याने शिरवळ पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. याबाबतची घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तेजल साळुंखे ही काल (दि. 3) दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, ता. भोर, जि. पुणे) या मित्राबरोबर पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील भाटघर धरणाच्या परिसरात फिरायला आली होती. हरतळी, ता. खंडाळा हद्दीत नीरा नदीवरील एका पुलाजवळून ती नदीपात्रात उतरली.
पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. याबाबतची माहिती दिगंबर साळेकरने भोर पोलीस ठाण्याला कळवली. भोर पोलिसांनी शिरवळ पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.त्यानंतर भोर व शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड व शिरवळ येथील बचाव पथकांच्या सहकार्याने शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, अजित बोराटे यांनी शोधमोहीम राबवली. ही मोहीम रात्री थांबवण्यात आली.