सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेसाठी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवशी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. समिती, शिक्षक संघाचा शिवाजीराव पाटील गट आणि शिक्षक बॅक परिवर्तन पॅनेल अशा तीन गटांमध्ये ही लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज सकाळपासून गर्दी होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकर पाटील काम पाहत आहेत. बॅंकेची रणधुमाळी तिरंगी होणार असल्याने शिक्षक सभासदांना राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. शिक्षक बॅंकेसाठी लढतीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. दि. 28 रोजी एकाने अर्ज मागे घेतला. दि. 31 रोजी 3 जणांनी, दि. 1 रोजी एकाने अर्ज मागे घेतला होता. दि. 2 रोजी आठ जणांनी अर्ज मागे घेतले. काल दि. 3 रोजी 12 जणांनी अर्ज मागे घेतले.
आज दि. 4 रोजी 12 जणांनी अर्ज मागे घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार कराड- पाटण 3, नागठाणे 3, आरळे 3, परळी 3, जावळी 2, महाबळेश्वर 2, वाई 2, खंडाळा 2, फलटण 4, गिरवी तरडगाव 3, कोरेगाव 2, रहिमतपूर 2, खटाव 2, मायणी 3, दहिवडी 3, म्हसवड 2, महिला राखीव 7, इतर मागास 3, विमुक्त जाती भटक्या जमाती 4, अनुसूचित जाती जमाती 4 असे 59 जण रिंगणात आहेत.
तालुकानिहाय बैठकांना वेग
दरम्यान, शिक्षक समिती आणि संभाजीराव थोरात गट, दोंदे गट एकत्र आला आहे. शिवाजीराव पाटील गट आणि पुस्तके गट एक झाला आहे. शिक्षक परिवर्तन पॅनेलनेही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तिरंगी लढत होत आहे. या तीनही गटात राजकीय खेचाखेची होणार हे निश्चित आहे. संघ आणि समितीच्या तालुकानिहाय बैठकांना वेग आला असून बॅंकेच्या मध्यवर्ती कार्यालयात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.