आळंदी – सध्याच्या काळात तरूणांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. व्यसन आणि फॅशनच्या मागे जग चालले आहे. बालकांना लहान वयातच योग्य संस्कार मिळणे गरजेचे आहे. खरा माणूस होण्यासाठी संतांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत. संततीपेक्षा संस्कार महत्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदी येथे श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळाचे वृंदावन कॉलनीत तीन दिवशीय (दि. 11 ते 13 मे) बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, मुलांना हरिपाठ, पसायदान, तबला, क्षेत्रभेट, या धार्मिक विषयांसह योगासने, प्राणायाम, निबंध लेखन, शालेय अभ्यास, विविध खेळ, आरोग्यविषयी कशी काळजी घ्यावी याबाबत जाणकारांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात 40 मुलांनी सहभाग घेतला होता.
शिबिराचे उद्घाटन डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. शिबिरात विद्यार्थ्यांना गुरुवर्य मारोती महाराज कुऱ्हेकर बाबा, विष्णुबुवा चक्रांकित, अशोक महाराज पांचाळ, शंकर महाराज पांचाळ यांचे आशीर्वाद मिळाले. गणेश गरुड यांनी मुलांना बोधपर गोष्टी सांगून मार्गदर्शन केले. सोहम पांचाळ, ज्ञानेश्वर जाधव, रविंद्र जोशी, भागवत दळवी, कृष्णा नलावडे, सोहम शाम गोराणे, डॉ निखील सोनवणे, डॉ आनंद बुचके यांनी मुलांना मार्गदर्शन केले. समारोपावेळी अध्यक्ष रेणुकादास पांचाळ, गणेश राऊत, दत्तात्रय सुतार, गणेश सुरवसे, रवींद्र रायकर, बाळासाहेब गरुड, गंगाधर पांचाळ, श्रावण जाधव, उत्तम अवघड, अशोक सुतार, रोहन पांचाळ, अर्जुन मेदनकर, हमीद शेख, प्रियंका गंधट, शुभांगी पांचाळ, वैभवी पांचाळ, मनीषा शेळके, सोनल अवघड आदी उपस्थित होते.
शिबिरातील मुलांनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले, अशी शिबिरे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शिबिरात प्रावीण्य मिळविलेल्या मुलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे रेणुकादास पांचाळ, गणेश राऊत, गोरखनाथ पांचाळ, नरसिंह पांचाळ, रोहन पांचाळ, सच्चिदानंद पांचाळ, सूर्यकांत पांचाळ, वसंत पांचाळ यांनी परिश्रम घेतले. शिबिराची सांगता पसायदानाने झाली.