दिमा हासाओ (आसाम) – आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यात अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे राज्याच्या इतर भागांशी रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यामुळे अनेक ठिकाणी अचानक पूर आणि भूस्खलनामुळे डोंगरी जिल्ह्याला फटका बसला आहे.
दिमा हासाओच्या हाफलांग क्षेत्रात एका महिलेसह तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय न्यू कुंजांग, फ्यांगपुई, मौलहोई, नामजुरांग, दक्षिण बागेतर, महादेव टिला, कालीबारी, उत्तर बागेतर, सीऑन आणि लोदी पांगमौल या गावांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जटिंगा-हरणगाजाव आणि माहूर-फाइडिंग येथील रेल्वे मार्ग भूस्खलनामुळे विस्कळीत झाला. गेरेमलांब्रा गावातील मायबांग बोगद्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. आसाममधील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे 25,000 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका कचर क्षेत्राला बसला आहे. ज्यामध्ये 21,000 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. त्यानंतर कार्बी आंग्लॉन्ग वेस्टमध्ये सुमारे 2,000 लोक आणि धेमाजीमध्ये 600 हून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.