शेवगाव – दक्षिण गंगा गोदावरी काठी असलेले, तसेच भगवान निम्बकाचार्यांचे जन्मस्थळ म्हणून तालुक्यातील श्री क्षेत्र मुंगीचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. अलीकडे मात्र या प्राचीन तीर्थक्षेत्राचा लौकिक वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होतो आहे. येथे महिलेच्या अंत्यविधीनंतर त्यांची रक्षाच चोरीला जात असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येऊ लागला आहे. मृतांच्या अंगावरचे सोने मिळवण्यासाठी काही जण स्मशानभूमीतील राखच गायब करत आहेत.
काळ्या कसदार शेतीचा परिसर आणि गर्भश्रीमंती लाभलेल्या कुटुंबांचे वास्तव्य असलेलं हे गाव. हिंदू समाजाच्या अंत्यविधीच्या प्रथेनुसार हिंदू पुरुषाच्या अंगावरील करगोटा देखील तोडला जातो, तर महिलांच्या निधनानंतर तिच्या तोंडात सुवर्णपान ठेवतात. त्यात महिला अहेव असेल म्हणजे तिचा पती हयात असताना तिचे निधन झाले असेल तर अशा सुवासिनीच्या अंगावरील नाकातील नथ, गळ्यातील मणी मंगळसूत्र, कानातील कुडकं, आणि पायाच्या बोटातील जोडवी न काढण्याची प्रथा आहे.
कालपरत्वे परिस्थितीनुरूप यात बदल होतो आहे. तरीही किमान एक-दोन कमी वजनाचे अलंकार, तसेच ठेवून अग्निसंस्कार करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी राख सावडण्याच्या वेळी काही अस्थी दहाव्यासाठी ठेवून सर्व रक्षा, अस्थी अगदी झाडून तीर्थक्षेत्रस्थळी गंगेत विसर्जित केल्या जातात.
रक्षा विसर्जित करण्याच्या ठिकाणी विसर्जित राखेतून किडूक मिडूक व पैसे शोधणाऱ्या अनेक टोळ्या असतात. अनेकदा या टोळ्या राखेचे विसर्जन करेपर्यंतसुद्धा थांबत नाहीत. रक्षा विसर्जनासाठी आलेल्या दुःखितांच्या हातातून रक्षेचे गाठोडे हिसकावण्यापर्यंत त्यांची मजल जाते. सध्या मुंगीला देखील याच लोभापोटी या रक्षेच्या चोरीचा नवीन फंडा या टोळ्यातील लोकांनी सुरू केला असावा.
पहारेकरी ठेवण्याची वेळ!
मुंगीचे सामाजिक कार्यकर्ते भगवान खुरमुरे यांची चुलती कै सुलोचना नारायण खुरमुरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीनंतर रात्रीच त्यांची रक्षा गायब झाली आहे. दशक्रिया विधीसाठी लागणारी अस्थीसुद्धा शिल्लक राहिली नसल्याने मुंगी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याअगोदर देखील अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. आता या भागात अंत्यविधी झाल्यानंतर तेथे पहारेकरी ठेवण्याची वेळ मृतांच्या नातेवाइकांवर आली आहे.