प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 29 – पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात हिंमत शाळा नावाचा उप्रकम नववीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे. उत्तीर्ण होऊ शकलो नाही, या कारणातून अनेक विद्यार्थी पुढील शिक्षण अर्धवटच सोडून देतात. अशा विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमातून जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, शिक्षण अर्धवट सोडले आहे, अशा विद्यार्थ्यांना विशेष पद्धतीचे शिक्षण दिले जाते. मुळशी येथील राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या वतीने हिंमत शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेत शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण देखील विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
याबाबत शाळेचे संपर्क अधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले की, मुळशी येथील अंबडवेट येथे अनुत्तीर्णांची हिंमत शाळा 2011-12 मध्ये सुरू केली आहे. शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात किती मुले ही शाळाबाह्य आहेत याचे सर्वेक्षण केले. त्यात एक बाब लक्षात आली बऱ्याच विद्यार्थ्यांनी आठवी, नववी मध्येच अनुत्तिर्ण झाल्याच्या कारणातून शिक्षण सोडून दिले आहे, अशा मुलांसाठी हिंमत शाळा सुरू करण्यात आली.
या शाळेद्वारे “17 नंबरचा फॉर्म’ भरून त्यांना पुन्हा दहावीच्या परीक्षा देण्यासाठी तयार केले जाते. तसेच, अभ्यासा बरोबरच व्यावसायिक शिक्षणही या विद्यार्थ्यांना दिले जाते. या शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय व्यावसायिक शिक्षण म्हणजे मोबाइल रिपरिंग, इलेक्ट्रिक साधन दुरुस्ती, गॅरेज, शेती विषयक प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी, विविध वयोगटातील 30 ते 40 विद्यार्थी या शाळेत दाखल होतात आणि दहावी उत्तीर्ण होतात. मुळशीतील हिंमत शाळेमुळे या तालुक्याला एक नवी शैक्षणिक ओळख निर्माण झाली आहे.