प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 29 –पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची जेवढी पाणी साठवण क्षमता आहे. तेवढा गाळ उजनी धरणात साचला आहे. उजनीमध्ये आतापर्यंत तब्बल 15 अब्ज घनफूट (टीएमसी) गाळ साचला असून या धरणासह भाटघर धरणात साचलेला 3.84 टीएमसी गाळ काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) राज्यासह देशभरातील 93 धरण प्रकल्पांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये 93 प्रकल्पांपैकी 14 प्रकल्पांमध्ये जमिनीची धूप होण्याचे प्रमाण जलसंपदा विभागाने अंदाजित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी होते. 21 प्रकल्पांत हे प्रमाण दुप्पट होते. मात्र, 17 धरणांत दोन ते तीन पटीने अधिक गाळ आला. 11 धरणांत तीन ते चार पट गाळ आला. सात धरणांत चार ते पाच पट गाळ आला, तर 23 धरणांत पाचपटीपेक्षा जास्त जमिनीची धूप होऊन गाळ जमा झाला, असल्याचे म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी आणि पुणे जिल्ह्यातील भाटघर या धरणांचा समावेश आहे. उजनी धरणाचा अभ्यास केला असता यामध्ये 14.97 टीएमसी गाळ आला आहे. तसेच, उजनीत दरवर्षी 0.43 टीएमसी गाळ जमा होत आहे. भाटघर धरणाचे पाणलोट क्षेत्र 331.50 वर्ग किलोमीटर आहे. या धरणात 3.84 टीएमसी गाळ साचला असून या गाळामुळे 3.84 टीएमसीने पाणी कमी साचत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
धरणांतील गाळ काढणे प्रक्रियेसाठी समिती
सोलापूर जिल्ह्यातील उजनी, नाशिक जिल्ह्यातील गिरणा, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द, औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी आणि नगर जिल्ह्यातील मुळा या पाच धरणांमधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नाशिक येथील मेरीचे महासंचालक रा. रा. शहा यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती तयार करण्यात आली आहे. नाशिक येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. सं. म. बेलसरे, जलविद्युतचे मुख्य अभियंता सं. रा. तिरमनवार, पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे हे सदस्य असणार आहेत. पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.