Babri Masjid : राम मंदिर आणि बाबरी मशीद हा वाद देशात तब्बल तीन दशकं सुरु होता. या संपूर्ण घटनाक्रमात मैलाचा दगड आणि हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला तो म्हणजे बाबरी मशीद पाडली गेली तो क्षण. 6 डिसेंबर 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्याचे प्रतिसाद सर्व देशभरात उमटताना पाहायला मिळाले.
दरम्यान, बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांनी पाडलेल्या मशिदीची दोन वीट आपल्या सोबत आणली होती. 32 वर्ष त्यांनी ती वीट जपून ठेवली आहे.
मंदिर बांधून झाल्यावर ती वीट हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता. राम मंदिर बांधून झाले पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यामुळे त्यांनी आज ही वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट दिली आहे.
ही भेट स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “6 डिसेंबरला बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथे गेले होते, त्यात बाळा नांदगावकर होते. ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या वीटा होत्या, त्यातल्या दोन वीटा बाळा नांदगावकर घेऊन आले होते.
एक वीट त्यांच्याकडे आहे, आज दुसरी वीट त्यांनी भेट म्हणून दिलीय. वीटचे वजन बघून समजेल किती मजबूत आहे. तेव्हाचं कन्स्ट्रक्शन चांगलं होतं कारण तेव्हा कंत्राटं निघत नव्हती. हा बाबरी मशीद पाडली त्याचा पुरावा आहे. राम मंदिराच्या निर्माण कार्यातीलही एक वीट मला आणायची आहे.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.