सातारा – शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता पूर्वी असलेल्या परंतु आता काढून टाकण्यात आलेल्या आयलॅंडच्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलॅंड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोवई नाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई आयलॅंड सुशोभीकरण करण्याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीची माहिती देताना शंभूराज देसाई म्हणाले, “”जिल्हा बॅंक इमारतीसमोर युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे पूर्वी एक आयलॅंड होते. हे आयलॅंड ग्रेड सेपरेटच्या कामांमध्ये काढून टाकण्यात आले आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलॅंड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बगिचासह अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन तयार करून आयलॅंड तयार होईल. याबाबत राजघराण्याची काही शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल.’
बाळासाहेब देसाई हे जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष होते. जिल्हा लोकल बोर्डाच्या इमारतीच्या त्यावेळच्या अंतर्गत रचना, तत्कालिन सर्व अध्यक्षांचा प्रतिमा असेल अशी एक प्रेक्षणीय इमारत उभी करण्यात येणार आहे. त्या कामाला मान्यता मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई; राजघराण्याशी चर्चा करून गैरसमज दूर करू
महापूर आणि भूस्खलनात बाधित झालेल्या 9 गावांतील 614 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी मान्यता दिली आहे. त्यासाठी बहुतांशी ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे. जलसंपदा विभागाची जागा वर्ग करण्याचा प्रस्ताव असून तो प्रश्न महिनाभरात सुटेल. पंधरा दिवसांत या घरांच्या बांधकामाचे टेंडर निघणार असून 10 सप्टेंबरला घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात गावातील जी घरे अजुनही धोकादायक आहे त्यांचा सर्व्हे करून ती घरांचे काम पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. याशिवाय वनविभागाच्या हद्दीतील 30 ते 40 गावांतील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडून उपद्रव होत असून पिकांचे नुकसान होत आहे. त्यासाठी त्या परिसराला सौर कुंपण घालण्याचा प्रस्ताव आहे. शक्य तेथे सौर कुंपण आणि शक्य तेथे चर काढावे, असा प्रस्ताव दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.