वॉशिंग्टन : आधुनिक काळातील ताण-तणावाचे जीवन आणि स्पर्धात्मक वातावरण यामुळे प्रत्येकाला सुखाचा शोध घेत असताना त्रास होत आहे. या जीवनशैलीशी जुळवून घेताना सुखी आणि समाधानी जीवन कसे मिळवायचे याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. नुकत्याच झालेल्या एका नवीन संशोधनाप्रमाणे व्यक्तीने स्वतःसाठी दररोज दोन तास जरी दिले तरी तो आरोग्यपूर्ण आणि सुखी आयुष्य जगू शकतो.
जीवन जगत असताना नेहमीच इतर लोकांशी संबंध येतो कुटुंबातही अनेक लोक आपल्या अवतीभवती असतात पण या सर्व गोष्टीपासून थोडे बाजूला जाऊन प्रत्येकाने दिवसातून दोन तास जरी स्वतःसाठी दिले तरी त्याच्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा चांगला परिणाम आगामी कालावधीतील जीवनशैलीवर होऊ शकतो. लेनोवो नावाच्या कंपनीने केलेल्या या संशोधनाप्रमाणे आठवड्यातून किमान तीन दिवस जरी प्रत्येक व्यक्तीने आपल्यासाठी दररोज दोन तास बाजूला काढून ठेवले तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.
या दोन तासांमध्ये फक्त त्या व्यक्तीने स्वतःसाठीच आयुष्य जगणे अपेक्षित आहे या कालावधीमध्ये तो वाचनासारखा छंद जोपासू शकतो किंवा व्यायाम करू शकतो किंवा टीव्ही आणि मोबाईलवर आपला एखादा आवडता कार्यक्रमही बघू शकतो पण हे दोन तास त्याने फक्त स्वतः बरोबरच घालवणे महत्त्वाचे आहे. लेनोवो कंपनीने केलेल्या या संशोधनाप्रमाणे सर्वसाधारण माणसांपैकी किमान 52 टक्के लोक स्वतःसाठी दररोज 10-15 मिनिटे सुद्धा काढू शकत नाहीत.आधुनिक काळामध्ये कामाचे तासही वाढले असल्याने जरी प्रत्यक्ष कार्यालयीन कामकाज जरी संपले तरी संगणकावरील ईमेल सारख्या कामामुळे त्याचाही ताण निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचा ताण जर कमी करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने जाणीवपूर्वक स्वतःसाठी काही वेळ बाजूला ठेवायला हवा असे या संशोधनात म्हणले आहे.
कौटुंबिक जबाबदारी आणि कार्यालयीन जबाबदारी सांभाळताना अनेकांना कसरत करावी लागते त्यामुळे सुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर अशाप्रकारे स्वतःसाठी काही वेळ बाजूला काढून ठेवणे महत्त्वाचे आहे, असे संशोधनात म्हटले आहे. व्यक्तीला प्रारंभीच्या कालावधीमध्ये जरी दोन तास बाजूला काढून ठेवणे शक्य नसेल तरी काही मिनिटांपासून सुरुवात करणे शक्य आहे. आठवड्यात तीन दिवस जरी प्रत्येक व्यक्तीने किमान दोन तास स्वतःसाठी बाजूला काढून ठेवले तरी उर्वरित कालावधीसाठी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो असेही या अहवालात म्हटले आहे.