पिंपरी – रावेत येथील पवना नदीपात्रात सध्या जलपर्णीचा थर साचला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या पंपींग स्टेशनच्या बाजुलाच जलपर्णी वाढल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जलपर्णीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
पवना नदीपात्रात दरवर्षी साचणारी जलपर्णी हा कळीचा मुद्दा ठरत आला आहे. महापालिका प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र वारंवार पाहण्यास मिळते. जलपर्णी काढण्याचे काम मुळातच विलंबाने दिले जाते. जलपर्णी काढण्याचे काम सोपविलेल्या ठेकेदाराकडूनही काम उशीरा सुरू केले जाते. तसेच, पूर्ण जलपर्णी न काढता ती नदीपात्रात पुढे ढकलण्याचे काम ठेकेदाराकडून केले जाते. पावसाळा सुरू झाल्यावर ही जलपर्णी वाहून जाते. हे चित्र बदलणे गरजेचे आहे.
रावेत येथील बास्केट ब्रीजजवळील पवना नदीपात्रात सध्या सर्वत्र जलपर्णी पाहण्यास मिळत आहे. त्याचा नदीपात्रात जणु हिरवा गालिचाच तयार झाला आहे. त्याशिवाय, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपींग स्टेशनच्या बाजुलाही जलपर्णी साचली आहे. जलपर्णी साचल्यामुळे नदीपात्राजवळ दुर्गंधी येत आहे. तसेच, परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही जलपर्णी तात्काळ काढणे गरजेचे आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपींग स्टेशनच्या बाजुलाच जलपर्णी साचली आहे. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नदीपात्रातील जलपर्णी आणि गाळ काढण्याचे नियोजन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने करावे.
– तुकाराम भोंडवे, माजी नगरसेवक