नागपूर – आपला इतिहास विसरणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल कळत नाही. त्यामुळे देशाप्रति संवेदनशील असणारी, आत्मभान असणारी नवी पिढी निर्माण करण्यासाठी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळला जात असल्याचे प्रतिपादन, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस केंद्र व राज्य शासनाने जाहीर केला आहे. यानिमित्त आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फाळणी वेदना दिवस पाळला जात आहे. यानिमित्ताने फाळणी आणि वेदना या विषयावर नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये फाळणीची वस्तुस्थिती मांडली आहेत. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते आज झाले. यावेळी फाळणीमध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबांचा सन्मान व नागरिकत्व दाखले वितरण करण्यात आले तर स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मानही करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसा साजरा करावा याबद्दलचे नियोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आजादी का अमृत महोत्सव हा सरकारी नव्हे, सामाजिक उपक्रम झाला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक समाज घटक यामध्ये सहभागी झाले पाहिजे. आज आम्ही जो दिवस पाळत आहो, हा अतिशय दुःखाचा आहे. त्यामुळे आजचा दिवस साजरा नव्हे तर पाळत आहोत, असे आपण म्हटले पाहिजे, असे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले.