नवी दिल्ली – कॅनडा आणि भारतादरम्यानच्या वादामुळे भारत (india) आणि अमेरिकेदरम्यानचे (america) संबंध बिघडणार नाहीत, असे अमेरिकेच्या भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे. भारत-अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यता अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी वर्तवली असल्याचे वृत्त अमेरिकेच्या दूतावासाने फेटाळून लावले आहे.
अमेरिकेतील एका वृत्त संकेतस्थळाने गार्सेटी यांच्या वक्तव्याबद्दलचे वृत्त फेटाळले होते. “अमेरिकेने भारतीय अधिकाऱ्यांबरोबरचे संबंध अनिश्चित कालावधीसाठी कमी करण्याची गरज आहे.’ असे गार्सेटी यांनी म्हटल्याचे या वृत्तामध्ये प्रसिद्ध झाले आहे. यासाठी या संकेतस्थळाने काही अज्ञात सूत्रांचा हवाला दिला आहे. मात्र हे वृत्त अमेरिकेच्या दूतावासाने सपशेल फेटाळून लावले आहे.
एरिक गार्सेटी हे भारत सरकार आणि भारतीय समुदायाबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत, असे अमेरिकेच्या दूतावासातील प्रवक्त्याने म्हटले आहे. खलिस्तानी नेता निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यापासून दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. भारताने नुकतेच कॅनडाच्या 41 अधिकाऱ्यांना मायदेशी परत पाठवण्याची सूचना कॅनडाला केली आहे.