कोल्हापूर – देश पातळीवर आज कामगारांविषयी जे धोरण आखले जात आहे त्या धोरणांनुसार कामगारांचे संरक्षण कसे टिकवायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावावर जो बदल केला जात आहे त्यामुळे कामगारांचे हक्क कमी करण्याचा कुटील डाव आखला जात आहे. या नवीन कायद्यामुळे शोषित बांधवांचे जीवनच उद्ध्वस्त होणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित शिबिरात ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवताना संविधानात फार विचारपूर्वक काही तरतुदी केल्या होत्या. ज्यामुळे कामगारवर्गाला मोठ्या सवलती होत्या. मात्र ही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यांचे हक्क मर्यादित केले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मध्यंतरी शेतकऱ्यांविषयी चुकीचे धोरण देशातील राज्यकर्त्यांनी घेतले होते. शेतकऱ्यांविरोधात असलेले तीन कृषी कायदे आणले गेले होते. शेतकऱ्यांनी या विरोधात मोठे आंदोलन उभारले आणि शेतकऱ्यांसमोर राज्यकर्त्यांना झुकावे लागले. कामगारांच्या हितासाठीही देशव्यापी आंदोलन आपल्याला पुकारले पाहिजे तेव्हाच कष्टकरी बांधवांचे हक्क आपल्याला शाबूत ठेवता येईल.
मधल्या काळात कंत्राटी कामगारांचे प्रमाण जास्त झाले आहे. या कंत्राटी कामगारांना कोणताही न्याय दिला जात नाही. खाजगी कारखान्यांचे प्रमाण वाढले आहे. यातही कामगार बांधवांकडून कमी पगारात जास्त तास काम करून घेतले जात आहे. कामगार चळवळीने याकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.