बेंगळुरू- महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याचे शतक, उपेंद्र यादवचे अर्धशतक तसेच अभिमन्यू इश्वरन व रजत पाटीदार यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर भारताच्या ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या तिसऱ्या अनधिकृत कसोटीत पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 293 धावा केल्या. दिवसातील अखेरच्या काही मिनिटांत भारताचा डाव संपल्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव शुक्रवारी सुरू होईल.
Stumps Day 1: India A – 293/10 in 86.4 overs (R D Chahar 13 off 29, Mukesh Kumar 0 off 0) #IndAvNzA #IndiaASeries
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 15, 2022
कर्णधार प्रियांक पांचाळने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. ढगाळ हवामान व थोडीशी दमट खेळपट्टी असूनही ऋतुराजने भक्कम खेळी केली. कर्णधार पांचाळसह सर्फराज खान व शार्दुल ठाकूर यांना अपयश आले. मात्र, अभिमन्यू इश्वरनने 38 धावांची खेळी करत ऋतुराजला सुरेख साथ दिली. तो स्थिरावल्यावर बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदारने 30 धावांची खेळी करताना ऋतुराजसह संघाचे शतक फलकावर लावले.
पाटीदारही चांगला खेळत असताना बाद झाला. मात्र, उपेंद्र यादवने 76 धावांची आक्रमक खेळी करत ऋतुराजसह भक्कम भागीदारी करत संघाला अडीचशे धावांजवळ पोहोचवले. अर्धशतकानंतर यादवने धावांचा वेगही वाढवला. मात्र, याच प्रयत्नात तो बाद झाला. दरम्यान, ऋतुराजने यंदाच्या मोसमात सातत्याने येत असलेले अपयश पुसून काढताना दमदार शतक साकार केले. त्यानंतर मात्र त्याचाही संयम सुटला व आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात 127 चेंडूंचा सामना करत 12 चौकार व 2 षटकार फटकावत 108 धावांवर बाद झाला.
भारताचा पहिला डाव 293 धावांवर संपला. न्यूझीलंड अ संघाकडून मॅथ्यू फिशऱने 4 गडी बाद केले. जेकब डबी व जो वॉकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सीन सोलिया व राचीन रवींद्र यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.