नवी दिल्ली – आर्थिक आघाडीवर सातत्याने मार खात असलेल्या पाकिस्तानची फुसके बार फोडण्याची वृत्ती अद्यापही कायम असल्याचे सूचित करणारे विधान त्या देशाचे हंगामी पंतप्रधान अनवरूल हक काकर यांनी केले आहे. इराणला पाकिस्तानने ज्या प्रकारे उत्तर दिले आहे त्यावरून भारतालाही स्पष्ट संदेश गेला असल्याची दर्पोक्ती त्यांनी केली आहे.
अरब न्यूज रिपोर्टने दिलेल्या एका बातमीनुसार एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या हद्दीत रॉकेट डागून इराणने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. अशा स्थितीत इराणला प्रत्युत्तर देण्याखेरीज अन्य कोणता पर्याय आमच्याकडे नव्हता. आम्ही हे प्रत्युत्तर देऊन भारत आणि पूर्ण विभागाला एक कठोर संदेश दिला आहे की आमच्या सार्वभौमतेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.
इराणने १६ जानेवारी रोजी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हवाई हल्ला केला होता. पाकच्या हद्दीत आश्रय घेतलेल्या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यासाठी आपण हे केल्याचे इराणने म्हटले होते. मात्र हे आपल्या सार्वभौमतेचे उल्लंघन असल्याचा दावा करत पाकने इराणच्या भागावर प्रतिहल्ला केला होता. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, काकर यांनी या मुलाखतीत इराणला बॅकफूटवर ढकलण्याचे श्रेय पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना दिले आहे. इराणने हल्ला केल्यानंतर आता काय करायचे याबाबत आमची भूमिका स्पष्ट नव्हती. मात्र भारताबाबत आमची रणनीती अगदी स्पष्ट आहे. त्यांच्याकडून हल्ला झाला तर आम्ही लगेचच कारवाई करू. मात्र इराणच्या बाबतीत तसे नव्हते. त्यांच्याशी आमचा कोणताही वाद नव्हता. त्यामुळे निर्णय घेणे थोडे अवघड होते. पण त्यांचा हल्ला चुकीचा होता व त्यामुळे आम्हाला कारवाई करावी लागली असे काकर म्हणाले