माले – मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवची सूत्रे हाती घेतल्यापासून त्या देशाचे भारताविषयीचे संबंध सामान्य राहीलेले नाहीत. आता चीनची राजकीय यात्रा करून आल्यानंतर मुइज्जू हे चीनच्याच भाषेत बोलत आहेत. चीन आणि मालदीव यांच्यात १९७२ मध्ये राजकीस संबंध प्रस्थापित झाल्यानंतर चीन सातत्याने मालदीवच्या विकासात सहकार्य करतो आहे असे मुइज्जू यांनी म्हटले आहे.
चीनच्या बेल्ट ॲंड रोड योजनेमुळे दोन्ही देशांतील संबंध नव्या उंचीवर गेल्याचा दावाही त्यांनी केला. मालदीवच्या अंतर्गत बाबींत चीन हस्तक्षेप करणार नाही. याच कारणामुळे दोन्ही देशांतील संबंध मजबूत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, या मुलाखतीत मुइज्जू यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्यावरही स्तुतिसुमने उधळली. आम्ही लहान देश आहोत याचा अर्थ आम्हाला धमकावण्याचा परवाना तुम्हाला मिळालेला नाही अशा शब्दांत त्यांनी भारतावरही अप्रत्यक्ष टीका केली होती.
तसेच भारतावरचे मालदीवचे अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी काही योजनांचीही अलिकडच्या काळात घोषणा केली आहे. आवश्यक खाद्य पदार्थ आणि औषधे अन्य देशांतून आणण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
एखादा देश आकाराने लहान असो वा मोठा, त्याच्या अंतर्गत बाबींत प्रभाव टाकण्याचा कोणत्याही देशाला अधिकार नाही. आपण मालदीवमध्ये असे होऊ देणार नाही अशी शपथही त्यांनी घेतली. तसेच गेल्या वर्षांत भारतासोबत झालेल्या द्विपक्षीय करारांचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.