पुणे – एमबीए, अभियांत्रिकी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरू कराव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तंत्रशिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर गुरुवारी “ढोल बजाओ’ आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू होण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
एमबीए सीईटीचा निकाल लागून पाच महिने झाले. मात्र, कोणत्याच प्रकारची प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केलेली नाही. खासगी विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया संपवून शैक्षणिक वर्षदेखील ऑनलाइन पद्धतीने सुरू केले.
अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एमसीए यांच्यासोबत बीएड, एमएड, विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा होऊन बराच कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अजूनही कोणत्या प्रकारची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही.
महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये महाविद्यालये सुरू झाली आहेत. प्रवेश प्रक्रिया चालू न झाल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रक्रियेसाठी अनेक अडचणी येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा तत्काळ निर्णय घेऊन, निकाल त्वरित जाहीर करावे; तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी “अभाविप’चे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री नागसेन पुंडगेसह आदींनी केली.