प्रत्येक व्यक्तीला आपले स्वप्नातील घर बनवायचे असते. आपले घर राजवाड्यासारखे सजविण्यासाठी लोक अनेक मजल्यांची घरे बनवतात. भरपूर पैसा खर्च करतात. परंतु एक गाव असेही आहे, जिथे कोणत्याही घराचा दुसरा मजला नाही.
हे अनोखे गाव राजस्थानमध्ये आहे. उडसर हे राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सरदारशहर तालुक्यातील एक गाव आहे. असं म्हणतात की शेकडो वर्षांपासून या गावात कोणीही त्यांच्या घरावर दुसरा मजला बांधलेला नाही.
गेल्या 700 वर्षांपासून या गावात ही अनोखी परंपरा प्रचलित आहे. यामागे एक धक्कादायक कारण सांगितले जाते. असे म्हणतात की या गावाला शाप आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे गाव 700 वर्षांपासून शापित आहे. इथला कोणीही त्यांच्या घराच्या वर दुसरा मजला बांधण्याचा विचार करू शकत नाही. असे केल्यास त्यांच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, असा समज आहे.
सुवासिनीच्या शापाची दहशत
या गावाबद्दल असे म्हणतात की शेकडो वर्षांपूर्वी भोमिया नावाचा एक माणूस गावात राहत होता. एकदा गावात चोर आले. भोमियाने या चोरट्यांशी मुकाबला केला. नंतर चोरांनी त्याला खूप मारले ज्यामुळे त्याची प्रकृती गंभीर बनली. त्यावेळी तो आपल्या सासुरवाडीत पोचला आणि घराच्या दुसर्या मजल्यावर लपला.
चोरही त्याच्यामागे तिथे पोहोचले. घरातील सदस्यांना मारझोड सुरू केली. चोरांना समजले की भोमिया घरी आहे. त्यानंतर चोरांनी त्याची मान कापली. पण तरीही त्या अवस्थेत तो चोरांशी झुंज देत राहिला आणि अखेर आपल्या गावी येऊन प्राण सोडला.
मग त्याच्या पत्नीने दुःखातिरेकाने शाप दिला की जर कोणी घराचा दुसरा मजला बांधला तर अनर्थ घडेल. त्यानंतर आजतागायत या गावात कोणीही नवीन घर बांधले नाही.