मुंबई – राज्यातील शाळा आणि महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार सर्वप्रथम नववी ते बारावी इयत्तेचे वर्ग सुरु करण्यात येतील. यानंतर टप्याटप्याने इतर इयत्तांचे वर्ग सुरु केले जातील, असे समजते. यासाठी राज्य सरकार सध्या सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांशी शाळा सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यास अनुकूल असल्याचे सांगितले. सर्वप्रथम नववी ते बारावी इयत्तेचे वर्ग सुरु केले जातील. त्यानंतर परिस्थिती पाहून उर्वरित वर्ग टप्प्याटप्याने सुरु केले जाऊ शकतात, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांचा शाळा सुरू करताना प्रामुख्याने विचार केला जाईल. सरसकटपणे शाळा सुरू करून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही व त्यांचे आरोग्य धोक्यात घालणार नाही, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
तसेच केंद्र व राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्य विषयक सर्व सुचनांचे व खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. शिक्षण हक्क कायद्याच्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हे मिळालेच पाहिजे. करोनाच्या प्रादुर्भावाने पालकांची आर्थिक परिस्थिती खराब झाली असल्याने त्यांना टप्प्या टप्प्यात फी भरण्याची मुभाही देण्यात आली आहे जर विद्यार्थी फी भरु शकला नाही तरी शाळा अशा विद्यार्थ्यांना आँनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. जर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.
अकरावी प्रवेश प्रक्रिया मराठा आंदोलनांच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे वेळ लागत आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लवकरच बैठक घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील असे आश्वासनही यावेळी वर्षा गायकवाड यांनी दिले.