न्हावरे – ५४८डी, न्हावरे – इनामगाव – आढळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता पोलीस बंदोबस्तात सुरु आहे. त्यामुळे येथील शेतजमीन बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन रस्त्याचे काम आडवण्याच्या प्रयत्न केला. यावेळी शिरूर पोलिसांनी दोघा तरुण शेतकऱ्यांना अटक केली. तर काही शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार आज (दि.२७) घडला आहे.
त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांवर दमदाटी करून संबंधित कंत्राटदाराने पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू ठेवले आहे. याच दरम्यान येथील बाधित तरुण शेतकरी व पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस दीपक कोकडे, शेतकरी, हॉटेल व्यावसायिक किशोर कोकडे यांनी अन्याय कारक पद्धतीने होणाऱ्या कामाला विरोध केला म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली.
या राष्ट्रीय महामार्गाने बाधित शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी ही रस्त्याची रुंदी किती? व नियमाने भूसंपादन होऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आहे. मात्र, प्रशासन व राजकीय नेते मंडळींनी याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे चौपदारीकरणाने बाधित शेतकरी वर्ग संतप्त झाला असून तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोरेकर, शिरूर तालुका शिवसेना प्रमुख सुधीर फराटे, न्हावरे चे माजी उपसरपंच जयवंतराव कोकडे, दादाभाऊ कोकडे, दादाभाऊ मारणे, मारुती सात्रस, बाळासाहेब मारणे, किरण नवले, दादा सात्रस, विठ्ठल नवले इत्यादी उपस्थित होते.
वीस मीटर पेक्षा जास्त रुंदीचा रोड होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही. रस्त्याचे काम नियमानुसार सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता दिलीप तारडे यांनी दिली आहे.