उस्मानाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटगाव इथे भेट देऊन अतिवृष्टिने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठिशी आहे, असा धीर दिला. दोन दिवसात नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय जाहीर करू, या शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते पुढे म्हणाले. पावसाच्या तडाख्याने या भागात “होत्याचं नव्हतं’ केले, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर, उस्मानाबादनंतर मुख्यमंत्री आता कोकणचा दौरा करणार आहेत.
आज मुख्यमंत्र्यांसमवेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही होते. यावेळी सतीश सुरवसे या ग्रामस्थाच्या घराची पडझड़ झाल्याने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा शिवारात अतिवृष्टिने नुकसान झालेल्या शेतशिवार आणि बाधित क्षेत्राची पहाणी केली.
अपण केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी मदतीशी संबंधित आकडेवारी जाहीर करणार नाहीत आणि त्यांनी जे पूर्ण करता येईल केवळ तेच करण्याचे वचन दिले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.