मांडवगण फराटा – कांदा बियाणांचा दर 20 हजार रुपये पायली झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणे उपलब्ध नसल्याने कांदा बियाणे शोधण्यासाठी शेतकऱ्यांची फरफट होत आहे. बियाणे चार ते सहा हजार रुपये किलोप्रमाणे मिळत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
गतवर्षी वातावरणामुळे कांद्याच्या बियाण्यावर मोठ्या रोगराई असल्याने यामुळे कांद्याचे बियाणे जास्त प्रमाणात तयार झाले नाही. यावर्षी उन्हाळी कांद्याच्या बियाण्याने मोठी झेप घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जास्त पावसामुळे कांदा लागवड गाळात गेली आहे. लागवड केलेला कांदा खराब होऊन उत्पादन घटणार आहे. कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
जास्त शेतकऱ्यांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. कांदा लागवडीसाठी रोपे शोधण्यासाठी पूर्ण कुटुंब कामाला लागले आहे. कांदा लागवडीसाठी मजूर खर्च मोठा असला तरी शेतकरी त्याची जुळवाजुळव करून कांदा लागवड करीत आहे. मात्र बियाण्याची मोठी अडचण झाली आहे.
इकडं आड तिकडं विहीर
लागवडीसाठी बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची इकडं आड तिकडं विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यातूनही मार्ग काढून शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे व बियाणे उपलब्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. कांदा बियाणे कृषी निविष्ठा दुकानांवर उपलब्ध झाली आहे. तरी त्याची कृत्रिम टंचाई शेतकऱ्यांना फायदेशीर नसल्याने याकडे लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, तरच शेतकऱ्यांना कांदा बियाणे उपलब्ध होणार आहे.