पुणे – राज्यातील करोना संसर्ग निवळत नाहीत तोपर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरू होणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती उच्च व तंशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. मात्र विद्यापीठांना स्वत:चे शैक्षणिक वर्ष त्यांच्यास्तरावर सुरू करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार ऑनलाइन क्लासेस सुरू राहतील, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अंतिम वर्ष परीक्षा तयारीचा आढावा घेतला.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यातील महाविद्यालये कधी सुरू होणार, या प्रश्नांवर राज्य शासनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्यातील करोना परिस्थिती कायम आहे.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावणे योग्य नाही. अशा स्थितीत महाविद्यालये सुरू करता येणार नाही. तोपर्यंत ऑनलाइन क्लासेसवर भर द्यावा लागणार आहे. ऑनलाइन शिक्षण त्यांच्या अभ्यासक्रमांत ग्राह्य धरले जाणार असल्याचे ते म्हणाले.