मुंबई – राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत काल संध्याकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे, तर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत.
मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची नोंद झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. आज सकाळी 8 वाजताच्या नोंदीनुसार जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 137 मिलीमीटर हून जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातल्या सर्व नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी बाजारपेठांमधे पाणी शिरले आहे.
सावंतवाडी तालुक्यात बांदा परिसरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. औंढा तालुक्यात पिंपळदरी परीसरात अतीवृष्टीमुळे, पिंपळदरी तलावाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे.
आज सकाळी 9 वाजता ईसापुर धरणाचा 8 क्रमांकाचा दरवाज 50 सेंटीमीटरवरून 1 मीटरने उघडला. आत्तापर्यंत धरणाच्या 13 वक्र दरवाजांमधू पैनगंगा नदीपात्रात 768 हून जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे.
परभणीतही गेले काही दिवस पावसाची संततधार कायम असल्याने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे.
सांगली जिल्ह्यातही कालपासून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. दुष्काळी भागात सतत गेले चार दिवस पडलेल्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला असला, तरी अनेक ठिकाणी खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे.