मुंबई – लॉकडाऊनमुळे देशात आणि परदेशात कमालीची अस्थिरता आहे. याचा परिणाम शेअरबाजारातील व्यवहारावर होऊ नये म्हणून बाजार नियंत्रक सेबीचे दैनंदिन कामकाजाकडे बारीक लक्ष आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत बाजारातील व्यवहाराकडे असेच लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बाजारातील अनिश्चिततेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी सर्व व्यवहार नियमांनुसार होतात का, हे व्यवहार वेळेवर पूर्ण केले जातात का, याकडे मार्च महिन्यापासून सेबीने लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत शेअरबाजारात अनियमितता आढळून आलेली नाही. आणखी ही परिस्थिती सुधारलेली नसल्यामुळे ऑक्टोबरअखेरपर्यंत लक्ष ठेवणारी यंत्रणा सक्रिय राहणार असल्याचे सेबीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
सर्व ब्रोकर्स आणि गुंतवणूकदार नियमाप्रमाणे काम करतात का, याकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर लॉकडाऊनचा बराच परिणाम झाला असला तरी भारतीय शेअरबाजार निर्देशांक मात्र बरेच वाढले आहेत.