संगमनेर (प्रतिनिधी) – खासगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पांडूरंग रायकर यांचे बुधवारी कोविडच्या संसर्गातून पुण्यात निधन झाले. त्यांचा दुर्दैवी मृत्यू व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा आहे.
अगदी कोपरगावमध्ये त्यांच्या कोविड चाचणीपासून ते पुण्यात त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यापर्यंतचा प्रवास पोखरलेल्या व्यवस्थेचे पितळ उघडे पाडणारा ठरला. त्यांच्या मृत्यूला केवळ गलथान प्रशासकीय व्यवस्था कारणीभूत आहे, असे आमचे ठाम मत असून त्यांच्या मृत्युची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन संगमनेर पत्रकार मंचने आज संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांना दिले.
पत्रकारांच्या भावनांचा आदर असून त्या भावना सरकार दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन देताना त्यांनी स्थानिक पत्रकारांना कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तहसीलदार अमोल निकम , पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी, उपाध्यक्ष नितीन ओझा, सचिव गोरक्षनाथ मदने, सदस्य सुनील नवले, शेखर पानसरे, गोरक्ष नेहे, राजू नरवडे, सतीश आहेर, अमोल मतकर, निलिमा घाडगे, अंकुश बुब, संजय साबळे व सुकदेव गाडेकर उपस्थित होते.