पुणे – महानपगरपालिकेचे दवाखाने बंद असल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. एकीकडे खासगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर शासन कारवाईचा बडगा उगारत असताना लाखो रुपयांचा निधी खर्च करून गोरगरिबांसाठी उभारण्यात आलेले येथील पालिकेचे दवाखानेच बंद आहेत. यांच्यावर कारवाई कोण करणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
करोनावर उपचाराच्या रगाड्यात पुणे पालिका प्रशासनाचे पालिकेच्या दवाखान्यांकडे दुर्लक्ष होत आहे. विश्रांतवाडीसह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील बहुतांश मनपा दवाखाने बंद असल्याची स्थिती आहे. तर, काही दवाखाने फक्त दोन ते तीन तास सुरू असतात. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्दी, खोकला, ताप यासह अन्य आजारांवर उपचार घेणेही सामन्य नागरिकांना कठीण झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार बळावत आहेत, अशा स्थितीत पालिकेचे दवाखाने सुरू असणे गरजेचे आहे. परंतु, केवळ करोनाच्या आजारावरच पालिका प्रशासन अडकल्याने अन्य आजाराच्या रुग्णांकडे, दवाखान्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते विनोद पवार यांनी सांगितले की, करोनासारख्या महामारीच्या काळात पालिकेचे सर्व दवाखाने सुरू ठेवणे आवश्यक आहे. विश्रांतवाडी परिसरातील दवाखाने बंद आहेत. याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, अद्यापही दवाखाने सुरू करण्यात आलेले नाहीत. झोपेचे सोंग घेतलेल्या आरोग्य प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करावे लागणार आहे.