उंब्रज (प्रतिनिधी) – उंब्रजसह परिसरातील गणेश भक्तांनी भक्तीमय वातावरणात अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला. विशेषतः पर्यावरणपूरक पध्दतीने शेकडो गणेश भक्तांनी आपल्या गणपती बाप्पांचे विसर्जन करुन रोटरी क्लब व कै. रामचंद्र दि. जाधव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
गणेशोत्सव हा मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे. ज्या भक्तीभावाने आपण गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतो. त्याच भक्तिभावाने बाप्पांचे विसर्जनही करतो. मात्र, बाप्पांच्या विसर्जनानंतर रासायनिक रंगांमुळे अनेकदा पाणी प्रदूषणाचा प्रश्न समोर आला आहे. बाप्पांची मूर्ती बनवण्यासाठी केमिकल्सयुक्त रासायनिक रंगद्रव्ये वापरली जातात.
बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर हे रंग नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्यात मिसळतात व मोठ्या प्रमाणावर पाणी प्रदूषण होते. तसेच नदीत निर्माल्य टाकल्यामुळे पाणी दुषित होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी गणेशमूर्तीं विसर्जनासाठी खास तयार केलेल्या कुंडात मूर्ती विसर्जन करावे यासाठी कै.रामचंद्र जाधव ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील व रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र सावंत युवराज नागे रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष मिलिंद माने, आशिष पटेल यांनी जनजागृतीपर आवाहन केले होते. या आवाहनाला यावर्षी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास 300 हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.