शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगावातील माऊलीनगर भागात रस्त्याची अतिशय दूर्दशा झाली आहे. सध्या लागून राहिलेल्या पावसात येथील नागरिकांना जीव मुठीत धरूनच चिखलातून वाट काढण्याची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यासाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार माऊलीनगरच्या नागरिकांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केला आहे. नगरपरिषद व या भागाच्या नगरसेवकांचे माऊलीनगरबाबत अक्षम्य दुर्लक्ष असल्याने येथे रस्ते, पाणी, गटारी, दिवाबत्ती या नागरी सुविधाचा अभाव आहे.
नगर परिषदेकडे या अडचणीचा पाढा अनेकदा वाचून झाला आहे. मात्र त्याचा उपयोग झाला नसत्याने त्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार येथील नागरिकांनी केला आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांत माऊलीनगर भागाची वाढ झाली असून अद्यापही येथे पक्के रस्ते झालेले नाहीत. असलेले रस्ते माती- मुरूमांचे असल्याने पावसाळ्यात हे रस्ते अत्यंत चिखलमय, निसरडे होऊन जातात. संततधार पाऊस सुरू असल्यानंतर तर दुचाकी वा अन्य वाहनांनी येथून जातांना जीव मुठीत धरून जावे लागते.
सध्या करोनामुळे लोक घरातच असले तरी अन्य जीवनावश्यक वस्तू तसेच नोकरी धंद्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडावेच लागते. ज्ञानमाऊली इंग्लिश मेडिअम स्कूल याच परिसरात असून तेथे परिसरातून येणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. सध्या शाळा बंद असली तरी शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांपुढे ही समस्या आहेच. अन्य परिसरातील सांडपाणी इरिगेशन कॉलनीजवळ सोडण्यात आले आहे. ते पाणी माऊलीनगरच्या रस्त्यालगत साठते. त्यातून डास, मच्छर यांची वाढ होत असून आरोग्याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्ववरून हे सांडपाणी जात असल्याने त्यातून या भागाला दूषित पिण्याचे पाणी मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ऍड. भाऊसाहेब शिंदे, ज्ञानमाऊली इंग्लिश मेडिअम स्कूलचे संचालक नवनाथ सुडके यांनी ही बैठक आयोजित केली होती.
अन्य भागातील सांडपाणी माऊलीनगर भागात सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हे पाणी बंद गटारीद्वारे बाहेर नेणे गरजेचे आहे. पाठपुरावा करूनही नगरसेवक व नगर परिषदेचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संतापाची भावना आहे.
अनिल म्हस्के, माजी सैनिक.हे.