प्रकल्पात मिश्र कचरा पाठवणे बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
फुरसुंगी – पुणे महापालिकेच्या फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोत साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पण, येथे फक्त डेपोत साचलेला कचऱ्यावरच प्रक्रिया करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. तरीही दररोज शहरातील मिश्र कचरा आणला जात आहे. त्यामुळे मंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ व्हावी, या मागणीसाठी रविवारी दोन्ही ग्रामस्थांनी कचरा डेपो प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत येणाऱ्या कचरा गाड्या परत पाठवल्या.
यावेळी शहरातून येणारी एकही कचरा गाडी डेपोवर जाऊ न देण्याचा आणि मिश्र कचरा येणे बंद होईपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी कचरा डेपो संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे, उपाध्यक्ष विजय भाडळे, डॉ. बाळासाहेब हरपळे, माजी सरपंच संजय हरपळे, रणजित रासकर, तात्यासाहेब भाडळे, चंद्रकांत हरपळे,अनंता भाडळे, प्रवीण कामठे, दत्ता राऊत, बाबासाहेब ढोणे, रमेश नेवसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावर प्रशासन काय तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
…ग्रामस्थांनी काय अर्थ घ्यायचा?
पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी कचरा डोपोला भेट देत मुख्य मागण्यांबाबत पाहणी केली. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचाच त्यांना विसर पडला. त्यांच्या समक्ष शहरातील मिश्र कचरा बायोमायनिंग प्रकल्पात येत असतानाही त्यांनी थांबवला नाही. उलट संबंधित ठेकेदार कंपनी भूमिग्रीन एनर्जीच्या संचालकांबरोबर वृक्षारोपण केले. याचा ग्रामस्थांनी काय अर्थ घ्यायचा? असा संतप्त सवाल विजय भाडळे यांच्यासह ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला.