सणबूर – पावसाच्या संततधारेमुळे मराठवाडी धरणाची पाणीपातळी वाढत आहे. प्रशासनाच्या गलथानपणामुळे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेतील उमरकांचन ता. पाटण येथील सोळा धरणग्रस्त कुटूंबांची तात्पुरती निवास व्यवस्था न करता कृष्णा खोऱ्याचे अधिकारी धमक्या देऊन त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यामुळे आता “बुडून मेलो तरी चालेल, पण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय घरे सोडणार नाही’, असा निर्धार केल्याने जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. वांग मराठवाडीच्या बुडीत क्षेत्रातील उमरकांचन येथील माहूली ता. कडेगांव येथे पुनर्वसित झालेले जयवंत भोसले, आनंदा मोहिते, कृष्णत मोहिते याबाबत माहिती देताना म्हणाले, उमरकांचन ता. पाटण येथील 74 कुटुंबाचे माहुली येथे पुनर्वसन प्रस्तावित होते.
नागरी सुविधासह गावठाणात आम्हाला भूखंड वाटप झाले. व जमिनीही आमच्या नावे टाकण्यात आल्या. पण प्रत्यक्षात सातबारावर भूखंड नोंदी झालेल्या नाहीत. वाटप जमिनीपैकी काही खडकाळ, मुरमाड, नापिक आहेत. तर काही लाभ क्षेत्रा बाहेरील आहेत.
अशा अनेक कारणांमुळेआमच्या पैकी 39 जणांनी पुनर्वसन नाकारून जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम व वर सरकून पुनर्वसन ही मागणी केली ती मान्य झाली. उर्वरित 35 कुटुंबानी अधिक चौकशी केली असता माहुली येथील फक्त 5.5 हेक्टर जमिन लाभक्षेत्रात येते.
बाकी जमीन लाभक्षेत्रातच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे 16 कुटुंबानी जमिनीला पाणी किंवा कायद्यानुसार चारपट जमीन द्या. ते शक्य नसेल तर जमिनीच्या बदली रोख रक्कम द्या ही मागणी दोन वर्षापूर्वी केली असून उमरकांचनचे वास्तव्य कायम ठेवले आहे.
आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तात्पुरती निवारा शेडस् उभारण्यास नकार देऊन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी आम्हाला धमकी देऊन हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप या कुटूंबांनी केला आहे.
तसेच आम्ही आता आरपारची भूमिका घेत आहोत. जलाशयात बुडून मेलो तरी चालेल पण मूळ घरे सोडणारच नाही. यावर्षी आमची घरे बुडणारच आहेत पण आम्ही घरे सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या भुमिकेमुळे कृष्णा खोऱ्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय जिल्हा प्रशासनासमोर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.