नवी दिल्ली – देशातील कोविड रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन तो सुमारे 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. करोनाचे अधिकाधिक रुग्ण बरे होत असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जात आहे. तसेच लक्षणविरहीत किंवा कमी लक्षणे असलेले रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत.
यामुळे आतापर्यंत देशात 15 लाख 83 हजार 489 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 47,746 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या देशभरात 6,39,929 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत केवळ 28.21 टक्के एवढे आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असल्यामुळे, बरे होणारे रुग्ण आणि सक्रिय रुग्णांमधील तफावत आणखी वाढून सुमारे 9.5 लाख इतकी झाली आहे. भारताच्या “टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या धोरणाचे अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसत असून त्यामुळेच ही तफावत वाढलेली दिसत आहे.
रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारून अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या. परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 2 टक्क्यांपेक्षा खाली जात 1.99 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.