भाविकांची गर्दी : इतिहासाची साक्ष देणारे शिवकालीन मंदिर
पवनानगर – इतिहासाची साक्ष देणारे वाघेश्वर येथील शिवकालीन वाघेश्वर मंदिराचे तब्बल 40 वर्षानी भाविकांनी श्रावण महिन्यात पहिल्यांदाच दर्शन घेतले.
मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील शिवकालीन वाघेश्वर मंदिर यावर्षी श्रावण महिन्यात पहिल्यांदाच भाविकांच्या दर्शनासाठी खुले असल्याने येथे श्रावणी सोमवारी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 1965 मध्ये पवना धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पवना धरण 1971 ला पूर्ण झाले. त्यावेळी पाणीसाठा करण्यात आला आणि हे ऐतिहासिक मंदिर पवना धरण्याच्या पाण्याखाली गेले. त्यानंतर वाघेश्वर येथील ग्रामस्थांकडून या मंदिराची प्रतिकृती गावाजवळ उभारण्यात आली.
वाघेश्वर मंदिराभोवती एक नीळकमल तळेदेखील होते. त्याकाळी या मंदिराभोवती पाच एकरहून अधिक जागा मोकळी होती, आजही धरणाचे पाण्याने तळ गाठला की आपल्याला पाहायला मिळते. मंदिर परिसरातील मोकळ्या जागेवर त्याकाळी त्रिपुरा पौर्णिमा आणि महाशिवरात्री या दिवशी मोठी जत्रा भरत असत. त्या जत्रेसाठी कामशेत, मुळशी, कोळवण व परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक बैलगाड्या घेऊन येत असत. त्यावेळेसचे भोर संस्थानचे पंतसचिव या संपूर्ण यात्रेचा खर्च करत असत, असे नागरिकांकडून सांगण्यात येते.
त्याकाळी तिकोणापेठ, लोहगड व कोळवण येथे ब्राम्हण समाजाचे वास्तव्य अधिक होते. या मंदिराची देखभाल करण्यासाठी भोरच्या पंतसचिवाने गणेश यशवंत पोकळे यांची नियुक्ती केली होती. तर पुजारी म्हणून लक्ष्मण कोंडू गुरव यांची निवड करण्यात आली होती. आज या दोन्ही व्यक्ती हयात नाहीत, परंतु त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव पांडुरंग गणेश पोकळे यांनी मंदिराची देखभाल केली. पवना धरणात पाणीसाठा केल्यानंतर हे मंदिर पाण्यात गेले, त्यानंतर 1993-94 मध्ये या मंदिराची पाण्याच्या बाहेर वाघेश्वर गावाजवळ प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आता ते सध्या तळेगाव येथे वास्तव्यास आहे, तर लक्ष्मण कोंडू गुरव हे वाघेश्वर येथे राहत आहेत. त्याचप्रमाणे हे इतिहास कालीन मंदिर असल्याचे सांगितले जाते.शिवाजी महाराज तिकोणा व कठीणगड (तुंग) किल्ल्यावर आले की आवर्जुन येथे दर्शनाला येथे येत असत.
यंदा पाऊस उशिरा झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी भरपूर खाली गेल्याने धरणामध्ये जून महिन्यात फक्त 17 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला होता, त्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने ऑगस्ट महिना आला तरी पाणी साठा फक्त 40 टक्केच झाला असल्याने यावर्षी श्रावण महिन्यात पहिल्यांदाच वाघेश्वराचे मंदिर दर्शनासाठी उघडे राहिले आहे.नागरिक सांगतात की,1972 च्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच पवना धरणाचे पाणी एवढे खाली गेले आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात नागरिकांना या स्वयंभू शंकराच्या पिंडीचे दर्शन मिळत असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
वाघेश्वर मंदिराची अख्यायिका…
पूर्वी या मंदिराला हेमाडपंथीय मंदिर म्हणून ओळखले जात. त्यावेळी अजिवली येथील गुहेमध्ये एक ऋषी राहत होते. त्यानी दिलेल्या माहितीप्रमाणे एक गुराखी दररोज गुरे घेऊन अजिवलीच्या या डोंगरावर येत असत. त्या गुरांमध्ये एक गाय होती, ती रोज त्या गुरांमधून गायब होत असे. हे त्या गुरवाच्या लक्षात आल्यानंतर त्याने एक दिवस त्या गायीचा पाठलाग केला, तर त्याला असे आढळून आले की, गाय आता मंदिर आहे, त्या ठिकाणावर उभी राहिली होती. तिच्या सडांमधून आपोआप दूध खाली पडत होते आणि त्या दुधातून एक स्वयंभू शंकराची पिंड तयार झाली. तेथे मंदिर उभारण्यात आले, त्यानंतर त्या मंदिराला व्याघ्रेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.