- महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ः तुटलेले चेंबर धोक्याची माळ
चिंचवड – आकुर्डी खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक रस्ता कायमस्वरूपी रहदारीचा आणि वर्दळीचा आहे. येथे पादचारी, लहान मोठ्या गाड्या नेहमी ये-जा करत असतात. परंतु फोर्स मोटर कंपनीच्या बाजूच्या ड्रेनेज लाइनच्या चेंबरची मागील एक वर्षापासून कायम दुरवस्था आहे. येथे सतत चेंबरची झाकणे तुटतात. तसेच पावसाळ्यात चेंबर तुंबतात त्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप येते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालक अथवा पादचाऱ्यांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
थरमॅक्स चौक परिसरात लहान मोठ्या विविध कंपन्या आहेत. तसेच हॉटेल व्यवसाय देखील येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यामुळे हा रस्त्यावर नेहमी गर्दी असते. तसेच हा रस्ता पुढे संभाजीनगर, त्रिवेणीनगर मार्गे ताथवडे चाकण औद्योगिक नगरीकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. थरमॅक्स चौकापुढे साने चौक, नेवाळे वस्ती, चिखली मार्गे मोशी व आळंदीकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावरून दिवसरात्र कामगार, विद्यार्थी, विविध कंपन्याकडे जाणारे दुचाकी, चारचाकी, मध्यम व अवजड वाहनाची ये-जा सुरू असते.
परंतु आकुर्डीकडून थरमॅक्स चौकांकडे जाताना ड्रेनेजलाइनच्या झाकणांचा कायमची अडचण आहे. सतत कोणत्याना ना कोणत्या चेंबरचे झाकण काढून टाकले जाते किंवा तुटलेले असते. त्याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग अथवा इतर प्रशासन लक्ष देताना दिसून येत नाही. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना व पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
लोडच्या गाड्या केल्या जातात पार्क
बऱ्याचदा कंपनीचा माल घेऊन आलेल्या मोठ मोठ्या लोडच्या गाड्या या रस्त्यावर पार्क केल्या जातात. त्या गाड्या चेंबरच्या झाकणांवर उभा केल्यास सिमेंटची झाकणे तुटून जात आहेत. त्यामुळे दुचाकी, सायकल, पादचारी यांच्या वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे चेंबर तुटले असता महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. रस्त्याने ये-जा करणारे जागृक नागरिक कोणाचा अपघात होऊ नये यासाठी तेथे झाडाची फांदी अथवा एखादे फडके काठीला बांधून उभा करतात. जेणेकरून येणाऱ्यांना येथे अपघाताचा धोका आहे याचा निर्देश मिळावा, महिना महिना ते चेंबर तसेच पडून असतात परंतु प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाचा कानाडोळा
चेंबरचे झाकण तुटले आहे. तेथे अपघाताचा धोका आहे. हे नागरिक दाखवून देतात. त्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येणे गरजेचे आहे. परंतु प्रशासन जणूकाही कोणाचा तरी अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
मी एका खासगी कंपनीत कामाला आहे. मला दररोज या रस्त्याने ये-जा करावी लागते. परंतु मागील एक महिन्यापासून येथील चेंबरचे झाकण तुटले आहे. अपघात होऊ नये यासाठी येथे लाकूड उभा केले आहे. परंतु वाहनचालकाच्या लक्षात न आल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित चेंबरची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
– कृष्णात कुंभार