नवी दिल्ली: भारत आणि 27 देश सदस्य असलेल्या युरोपीय संघादरम्यानचे भारताचे संबंध अधिक विस्तारण्यासाठी निश्चित कालमर्यादेमध्ये कृती आराखडा निर्माण करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे.
15 व्या युरोपीय संघ- भारत शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये बोलताना पंतप्रधानांनी भारत आणि युरोपीय संघादरम्यान संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि परस्परसंबंध अधिक दृढ करण्यासाठी संरक्षण दृष्टिकोन स्वीकारण्यात यावा. हे संबंध अधिक विस्तारण्यासाठी एक कृती आराखडा करण्यात यावा. या कृती आराखड्याची अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेमध्ये करण्यात यावी, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
भारत आणि युरोपीय संघ हे नैसर्गिक भागीदार आहेत. ही भागीदारी जगाच्या शांतता आणि स्थिरतेसाठी लाभदायक आहे. भारत आणि युरोपीय संघादरम्यान लोकशाही, विविध्यता, आंतरराष्ट्रीय संघटनांबाबतचा आदर , सर्वसमावेशकता, बहुपक्षीय, स्वातंत्र्य आणि पारदर्शकता ही सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. आर्थिक फेरउभारणी आणि मानवकेंद्रित जागतिकीकरणामध्ये भारत आणि युरोपीय संघाबरोबरची भागीदारी महत्त्वाची ठरू शकते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डर लेन हे शिखर परिषदेत युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष आहेत. युरोपियन संघ भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा गट आहे.
युरोपियन संघ हा 2018 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. 2018-19 मध्ये भारत आणि युरोपियन संघादरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 115.6 अब्ज डॉलर इतका होता. त्यात 57.17 अब्ज डॉलरची निर्यात आणि 58.42 अब्ज डॉलरची आयात होती.