आठ जणांवर गुन्हा दाखल
50 महिलांनी पोलीस ठाण्याला घातला घेराव
पिंपरी (प्रतिनिधी) – मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करीत खुनीहल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास लिंक रोडवरील पत्राशेड येथे घडली. जखमी तरूणाचा उपचारादम्यान शनिवारी (दि. 11) मृत्यू झाला. दरम्यान या प्रकाराने संतप्त स्थानिक महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घातल्याने थोड्या वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
करण महादेव पवार (वय 18, रा. पत्राशेड, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिषेक संजय गायकवाड (वय 19, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) यांनी बुधवारी (दि. 8) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आबाशा ऊर्फ पृथ्वीराज कांबळे, आदित्य भोसले आणि त्याचे सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी अभिषेक गायकवाड हे आपले मित्रांसोबत पत्राशेड परिसरात गप्पा मारत होते. त्यांचा मित्र करण पवार हा त्यांच्याकडे गप्पा मारण्यासाठी येत होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी “तू अमर चव्हाणच्या मित्राला मारतोस काय, आज तुला जिवंत सोडणार नाही, आज तुला मारूनच टाकतो,’ असे म्हणत आरोपींनी करण पवार याच्यावर कोयता, लोखंडी रॉड, दगड आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला. शनिवारी उपचारादरम्यान करण पवार याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान या गुन्ह्यातील उर्वरित सहा आरोपींना अटक करावी. तसेच ज्या दोन आरोपींना अटक केली आहे, त्यांना आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करीत जवळपास 50 महिलांनी चिंचवड पोलीस ठाण्याला घेराव घातला. यावेळी सहायक निरीक्षक अभिजीत जाधव व उपनिरीक्षक गणेश आटवे यांनी उपस्थित महिलांची समजूत काढली. येत्या दोन दिवसात सर्व आरोपींना अटक करू, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर त्या महिला मयत करण याच्यावर अंत्यसंस्कारासाठी माघारी गेल्या.