ध
नवी दिल्ली -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात “सीबीएसई’च्या बोर्डाच्या पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेसाठी धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, राष्ट्रवाद, नोटबंदी आणि लोकशाही अधिकार आणि अन्य काही प्रकरणे करोना आपत्तीच्या पार्श्वभुमीवर अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करण्याची आवश्यकता असणार नाही. “सीबीएसई’ने आज 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीचा सुधारीत अभ्यासक्रम निश्चित केला. मूळ अभ्यासक्रमातून 30 टक्के अभ्यासक्रमाला वगळण्यात आले आहे.
सुधारीत पाठ्यक्रमानुसार इयत्ता 10 वी च्या अभ्यासक्रमातून लोकशाही आणि वैविध्यता, लैंगिक, धार्मिक आणि प्रसिद्ध चळवळी, आंदोलन आणि लोकशाहीपुढील आव्हानांसारखी प्रकरणे वगळण्यात आली आहेत. तर इयत्ता 11 वी साठी संघराज्यवाद, नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि भारतातील स्थानिक सरकारांची वाढ यावरील प्रकरणे हटविली गेली आहेत.
त्याचप्रमाणे इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या शेजारी देशांबरोबरचे भारताचे संबंध, भारताच्या बदलत्या आर्थिक विकासाचे स्वरुप, देशातील सामाजिक चळवळी आणि नोटबंदीसारख्या अन्य विषयांशी संबंधित प्रकरणांचा अभ्यास करण्याची आवश्यकता असणार नाही.
विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रमाची फेरमांडणी केली आहे. मात्र अभ्यासक्रमामागील मूळ संकल्पना मात्र तशीच कायम ठेवण्यात आली आहे. या नवीन पाठ्यक्रमाला शिकवताना किती कालावधीची बचत केली जाऊ शकेल, याचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षण मंडळाने अभ्यासक्रम कमी केला आहे. यासाठी सर्व संबंधितांकडून सूचना मागवण्यात आलेल्या होत्या.
कमी केलेला अभ्यासक्रम हा अंतर्गत मूल्यांकनासाठी आणि वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी लागू असणार नाही. तरीही जी प्रकरणे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहेत, त्यातील विषय विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगितला जावा, अशी सूचना शालाप्रमुख आणि शिक्षकांना करण्यात आली आहे, असे “सीबीएसई’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
करोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी शटडाऊन लागू केला. तेंव्हापासून सर्व शाळा, विद्यापिठे आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आता लॉकडाऊनमधील बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण तरिही शाळा, महाविद्यालये अजूनही बंदच आहेत.