नवी दिल्ली -भारतीय हवाई दलाची विमाने रात्रीही पूर्व लडाख विभागात हवाई गस्त सुरू ठेवणार आहेत. त्या हवाई ताकदीमधून उच्च पातळीवरील सज्जतेचे दर्शन घडवले जाणार आहे. त्यातून माघार घेणाऱ्या चीनी सैन्याने जैसे थे स्थिती निर्माण करावी, असा स्पष्ट संदेश दिला जाणार आहे.
चीनी कुरापतींमुळे मागील सात आठवड्यांपासून पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती आहे. अखेर नरमलेल्या चीनने आपले सैन्याच्या माघारीची सुरूवात केली आहे. तसे असले तरी भारतीय लष्कर आणि हवाई दल प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत आपली हाय अलर्ट पातळी कायम ठेवणार आहे. तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने याआधीच एलएसी लगतची आपली तैनाती वाढवली. त्यासाठी विमाने आणि अटॅक हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली.
जवान, अवजड लष्करी सामग्री आणि शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठीही विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली. लेह आणि श्रीनगरमधील तळांवर जग्वार, सुखोई 30 एमकेआय, मिराज 2000 जातीची विमाने आधीपासूनच तैनात आहेत. भारतीय हवाई दलाची लढाऊ जातीची विमाने लडाख आणि लगतच्या भागांत सातत्याने घिरट्या घालत आहेत. आता चीनवरील दबाव वाढवण्याच्या उद्देशातून रात्रीच्या वेळीही हवाई गस्त घातली जाणार आहे.
पूर्व लडाख परिसरात असणाऱ्या एलएसीलगत शांतता अबाधित ठेवण्याची जबाबदारी चीनची आहे. त्या देशाने एलएसीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करू नये. जैसे थे स्थिती कायम ठेवावी, अशी ठाम आणि सातत्यपूर्ण भूमिका भारताने घेतली आहे.