मुंबई – मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई व कोकण विभागात अतिवृष्टी सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. चोवीस तासांत ठाण्यात सर्वाधिक 380 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, श्रीवर्धन – 230 मिमी, पनवेल, माथेरान, उरण प्रत्येकी 210 मिमी, मुंबईत 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई, ठाण्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते.
दक्षिण गुजरात आणि लगतच्या प्रदेशात तयार झालेल्या चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्रयुलेशन) स्थितीमुळे दोन दिवस सलग पाऊस कोसळत आहे. मुंबईत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज (5 जुलै) पहाटे 6 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा
येत्या चोवीस तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारण ते मुसळधार पाऊस पडेल, असा धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या चोवीस तासात शहरातील कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या काळात साधारण हवामान राहणार असून महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात हवेचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका असणार आहे. तसेच, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.