यंदाचे वर्ष हे चित्रपटसृष्टीसाठी खुपच दु:खद असल्याचे दिसून येत आहे. इरफान खान, ऋषि कपूर, वाजिद खान आणि सुशांत सिंह राजपूतनंतर आता नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनाने चित्रपटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. सरोज खान यांना 20 जून रोजी श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सरोज खान या बॉलीवूडमधील एकमेव नृत्य दिग्दर्शका आहेत ज्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. “देवदास’ चित्रपटाच्या “डोला रे डोला’, “जब वी मेट’मधील “ये इश्क हाय’ आणि “श्रृंगारम’ या चित्रपटातील गाण्यात भारतीय पारंपरिक नृत्य प्रकाराचे कोरिओग्राफसाठी सरोज खान यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दरम्यान, बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सरोज खान यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी सुमारे 2000 गाणी कोरिओग्राफ केली आहेत. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या “कलंक’ चित्रपटात त्यांनी अखेरच्या वेळी आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत काम केले होते.