वैष्णवांविना पांडुरंगाला भेटून पादुका आळंदित!
आळंदी – यावर्षी करोना महामारीचे संकट असल्याने श्रींचे पादुका सोहळा पंढरीनगरीतून द्वादशी दिनी रात्री उशिरा शासकीय निर्देशांचे, तसेच परंपरांचे पालन करीत ठिकठिकाणी आरती, स्वागत स्वीकारत हरीनामाच्या गजरात रात्री साडेनऊच्या सुमारास अलंकापुरीत विसावला.
आळंदी-पंढरीची वारी करून श्रींच्या पादुका दर्शनबारी मंडपातील हॉलमध्ये हरिनाम गजरात आणण्यात आल्या. यावेळी मोजक्याच 25 वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सोहळा वारी करून परतला. आता पुढच्या दशमीपर्यंत श्रींच्या पादुका कारंजा मंडपामध्येच राहणार आहेत.
थोरल्या पादुका देवस्थान मंदिरात अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, सोहळा प्रमुख योगेश देसाई, मालक राजाभाऊ आरफळकर, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरू, चोपदार बाळासाहेब रणदिवे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, संतोष मोझे, माउली घुंडरे आदी उपस्थित होते.
यावर्षी करोनाचे सावट सोहळ्यावर असल्याने वारीचे स्वरूप बदलले होते. आषाढ शुद्ध दशमी (दि. 30 जून) ला शासकीय नियंत्रणात माउलींच्या चल पादुका फुलांनी सजवलेल्या एसटी बसने पंढरीकडे मार्गस्थ झाल्या होत्या.
तिथे गेल्यावर चंद्रभागा स्नान, रखुमाई दर्शन आदींसह महत्त्वाचे वारीचे नित्याचे धार्मिक विधी करण्यात आले. वैष्णवांचा मेळा नसतानाही द्वादशीला गुरुवारी पांडुरंग भेटीचा सोहळा झाला आणि वारी परतीच्या वाटेला लागली. हा वारी सोहळा गुरुवारी (दि. 2) रात्री उशिरा धाकट्या पादुकामार्गे आळंदीत हरिनामाच्या गजरात प्रवेशला. यावेळी आळंदीत रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी श्रींच्या स्वागतास गर्दी केली होती. वारकरी संप्रदायानेही सरकारी नियमांचे पालन करीत घरीच सुरक्षित राहून वारीचा आनंदसोहळा अनुभवला. यावेळी अनेकांनी सोहळ्यात सहभागी होता न आल्याने खंत व्यक्त केली. मंदिरातील कारंजा मंडपात श्रींचे वैभवी पादुका ठेवण्यात आल्या आहेत त्या दशमीपर्यंत याच मंडपात विसावल्या जातील असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
दरवर्षी पालख्या पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन पौर्णिमेच्या दिवशी माघारी परततात आणि चालत दशमीला पुन्हा आळंदीत प्रवेश करतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर वारीचे वेळापत्रक बदलले तरी वारी अखंड राहिली हे यावर्षीच्या सोहळ्याचे विशेष आहे.