– प्रकाश गायकर
पिंपरी – शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेचे डॉक्टर व परिचारिका करत असलेल्या कामाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. गेल्या तीन महिन्यांपासून डॉक्टर, परिचारिका व स्टाफ अथकपणे आपले काम करत आहेत. याच “करोना’ योद्ध्यांमुळे शहरात सतराशेहून अधिक रुग्ण करोनावर मात करू शकले आहेत. परंतु आपल्या यशाचा आनंद व्यक्त करण्याइतकी उसंतही त्यांच्याकडे नाही. कारण रोज “करोनाबाधितां’चा आकडा उच्चांक गाठतो आहे आणि या योद्ध्यांच्या सहनशक्ती व परिश्रमांची परीक्षा घेतो आहे. पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ) किट घालून रुग्णांवर 8 ते 10 तास उपचार करणे एक आव्हान आहे. एवढा वेळ या योद्ध्यांना पाणी देखील पिता येत नाही, एवढेच काय तर लघुशंकेला देखील जाता येत नाही.
पीपीई किट घालून काम करणाऱ्या डॉक्टर व नर्सना मोठा त्रास सहन करून काम करावे लागत आहे. घामाच्या धारांनी ओलेचिंब झालेले शरीर घेऊन ते “करोना’सोबत झुंज घेत असतात. करोनाच्या लढाईत डॉक्टर व नर्स यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. एप्रिल व मे महिन्यात भीषण उकाडा होता. जून महिन्यातही शहरात उकाडा जाणवू लागला आहे. या तापमानात करोनाचे रुग्णही वाढत आहेत. करोनाच्या उपचारात स्वतःला झोकून दिलेल्या डॉक्टरांना उपचार करताना पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. उपचार करण्यापेक्षा पीपीई किट घालून काम करणे अधिक अवघड आहे. ज्या ठिकाणी उपचार करायचा आहे तिथे एसी लावता येत नाही. आयसीयूचे वातावरण सामान्य ठेवावे लागते. अशा वातावरणात पीपीई किट घालून डॉक्टरांची दमछाक होत आहे.
पीपीई किट घालून काम करत असताना संपूर्ण चेहरा व शरीर झाकलेले असते. त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो. शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत घामाने ओलचिंब होत असतो. डोक दुखणे, चिडचिड होणे असा त्रास होतो. शुद्ध ऑक्सिजन मिळत नसल्याने ताजेतवाने वाटत नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. रुग्णांसबोत मोठ्याने बोलावे लागते, पीपीई किट घातली असल्यामुळे त्यांना ऐकू जात नाही.
– डॉ. सुहास जगदाळे, वायसीएम रुग्णालय
आठ तासांची ड्युटी आहे. रात्रपाळी असेल तर 13 तास काम करावे लागते. त्या संपूर्ण कालावधीमध्ये पीपीई किट घालूनच रुग्णांची सेवा करावी लागते. श्वास घ्यायला खूप त्रास होतो. समोर धुके असल्यासारखे दिसते. पीपीई किटच्या कव्हरवर पूर्ण घाम पसरतो. रुग्णांना भावनिक जवळीकतेची आवश्यकता असते. सर्व परिचारिका खूप मेहनतीने आणि दिलासा देत रुग्णांची सेवा करत आहेत.
– एजेन्सा रोजरिओ-गायकवाड, परिचारिका, महापालिका रुग्णालय
करोना योद्ध्यांना असा होतो त्रास
पीपीई किट घातल्याने सातत्याने घाम येत असल्याने शरीरातील पाण्याचा स्तर कमी होतो. खाज सुटते तसेच संपूर्ण शरीर घामाने भिजून जाते.
किट घातल्यानंतर जास्त घाम येतो, मधुमेह व बीपी आदी समस्येने त्रस्त असलेल्या डॉक्टरांना जीव गुदमरल्यासारखा वाटतो.
एकदा डॉक्टर वॉर्डमध्ये शिरले की ड्युटी संपेपर्यंत त्यांना बाहेर पडता येत नाही. या आठ ते दहा तासांच्या कालावधीत त्यांना पाणीही पिता येत नाही तसेच लघुशंकेलाही जाता येत नाही. पीपीई किट सोबतच त्यांना सर्जिकल मास्क, ग्लोव्हज व चेहरा झाकण्यासाठी कव्हर घालावा लागतो.