नवी दिल्ली : चीनशी झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीतही इशान्येच्या राज्यांवर अन्याय केल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि त्रिपुराच्या राजघराण्याचे प्रमुख प्रद्योत माणिक्य देववर्मन यांनी याबाबत सर्वप्रथम आवाज उठवला आहे.
इशान्य भारतातील सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यांशी चीनची सर्वाधिक सीमा लागून आहे, या राज्यांमध्ये त्यांना स्वारस्यही खूप आहे. मात्र तरीही दुर्देवाने इशान्य भारतातील एकाही प्रादेशिक पक्षाला या सर्वपक्षीय बैठकीला निमंत्रित करण्यात आले नाही. अशा छोट्या गोष्टी आमच्या दैनंदिन आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतात. कदाचित याची आमच्यापेक्षा दिल्लीला अधिक जाणीव असावी, पण ते काही करतील का, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.